Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचं धुमशान, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत तर जनजीवन ठप्प, Video
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Rain Update: मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेकडो प्रवासी प्लॅटफॉर्मवर आणि थांबलेल्या लोकल ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत.
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा जोर इतका जास्त आहे की, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा आणि दादर स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. परिणामी गेल्या 20-25 मिनिटांपासून लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अचानक उद्भवलेल्या अडचणीमुळे शेकडो प्रवासी प्लॅटफॉर्मवर आणि थांबलेल्या लोकल ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत.
माटुंगा ते दादर दरम्यानच्या ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे एकाच वेळी तीन लोकल ट्रॅकवर थांबलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता, नाराजी आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. कामावर, शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या हजारो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रवासी तर कंटाळून धोकादायक मार्गांचा अवलंब करत असून थेट लोकलमधून उतरून ट्रॅकवर चालत आहेत. ही बाब अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
रेल्वे प्रशासनाने प्राथमिक माहिती देताना स्पष्ट केलं की, पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाईल. मात्र, पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने नेमकी वेळ सांगता येत नाही. पाणी उपसण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तर, उपाययोजना समाधानकारक नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रवासी नाराजी व्यक्त करत म्हणाले, "आम्ही गेली 30 मिनिटांपासून लोकलमध्ये अडकलेलो आहोत. ना काही सूचना मिळत आहेत, ना मदतीसाठी कोणी येतंय. प्रत्येक वर्षी अशीच अडचण होते. त्यात काहीच सुधारणा होत नाहीत."
advertisement
फक्त रेल्वेच नव्हे, तर रस्त्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील अनेक लो-लाईंग भागांत पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुख्य रस्ते, जंक्शन आणि महामार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. काही भागांमध्ये वाहनं बंद पडल्याने ट्रॅफिक अधिकच वाढलं आहे. या परिस्थितीमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा आणि अन्य आपत्कालीन सेवांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे.
advertisement
दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसामुळे निर्माण झालेल्या या समस्यांचा सामना करताना खंबीर राहण्याचा प्रयत्न केला आहे. पण, प्रशासनाने यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक जोर धरत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 2:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचं धुमशान, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत तर जनजीवन ठप्प, Video

