NCP : मलिकांनंतर आता पटेल रडारवर, दानवेंनी काढलं इकबाल मिर्ची कनेक्शन
- Published by:Shreyas
Last Updated:
मलिकांनंतर आता विरोधकांनी प्रफुल्ल पटेलांवरुन भाजपच्या कोंडीचा प्रयत्न सुरू केलाय. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी फडणवीसांवर लेटरबॉम्ब टाकल्याचं पाहायला मिळालं.
नागपूर, 8 डिसेंबर : नवाब मलिकप्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून उघड विरोध दर्शवला. आधी मलिकांचा सत्ताधारी गोटात सहभाग आणि त्यानंतर फडणवीसांच्या या पत्रानं अधिवेशनाच्या पहिला दिवशी गाजवला. पण, मलिकांनंतर आता विरोधकांनी प्रफुल्ल पटेलांवरुन भाजपच्या कोंडीचा प्रयत्न सुरू केलाय. पहिल्या दिवशी फडणवीसांचं पत्र गाजलं, त्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी फडणवीसांवर लेटरबॉम्ब टाकल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांबाबतची भाजप ची भूमिका काय? असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला.
अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांकडून भाजपवर प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच महाविकास इतर नेत्यांनीही प्रफुल्ल पटेलांवरुन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.. दाऊदचा साथीदार असलेल्या इकबाल मिर्चीसोबत संबंध असणारे प्रफुल्ल पटेल तुम्हाला चालतात का? असा सवाल महाविकास आघाडीनं फडणवीस आणि भाजपला केलाय. विरोधकांच्या या आरोपांना पटेलांमागे लागलेल्या चौकशीचा ससेमिरा कारणीभूत आहे.
नवाब मलिक ह्यांच्याबाबत जशा तीव्र भावना आहेत तशाच दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेल ह्यांच्याबाबतही आहेत का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे केली.@iambadasdanve pic.twitter.com/XCcY5O4DLy
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 8, 2023
advertisement
पटेलांचं इकबाल मिर्चीप्रकरण काय आहे?
वरळी येथील इक्बाल मिर्चीचा ताबा असलेल्या इमारतीच्या पुनर्बांधणीचा काम पटेल यांच्या कंपनीने केले होते. पटेल यांच्याकडून यासाठी मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाला रोख रक्कम आणि काही जागा देण्यात आली. याच व्यवहारत गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची दोनवेळा ईडीकडून चौकशीही झाली, तसंच पटेलांच्या वरळीतील घरावर ईडीकडून कब्जाही करण्यात आला.
advertisement
महाविकास आघाडीकडून या मुद्द्याला धरुन भाजप आणि प्रफुल्ल पटेलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे भाजपनं याप्रकरणी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे प्रफुल्ल पटेलांनी मात्र विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी पत्र सोशल मीडियावर शेअर करत मलिकांना विरोध केला, यावरुन अजित पवार गटात नाराजी पसरल्याची चर्चा आहे. पण, यातच आता विरोधकांनी मलिकांविरोधातील याच पत्राचा आधार घेत, आता प्रफुल्ल पटेलांवरुन भाजपवर निशाणा साधलाय, त्यामुळे अधिवेशनाच्या दोन दिवसात राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांमुळे भाजपची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे फडणवीसांच्या पत्रामुळे सुरू झालेलं हे राजकारण पुढे काय वळण घेतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 08, 2023 9:46 PM IST