Raj Thackeray : लातूरमधील जमिनीवरील दावा प्रकरणावर राज ठाकरेंचे भाष्य, ''आता वक्फ बोर्डाने....''
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Raj Thackeray On Waqf Board : राज्यात एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठिंबा देताना केंद्र सरकार विरोधकांच्या विरोधाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.
मुंबई : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगावमधील जवळपास सगळ्याच शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. वक्फ बोर्डाने कथित दावा केलेली शेत जमीन ही 103 शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठिंबा देताना केंद्र सरकार विरोधकांच्या विरोधाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. तर, वक्फ बोर्डाने आपलं राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले की, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे... यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही. प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे? असा प्रश्न त्यांनी केला.
advertisement
काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने सादर केलं होतं. त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको, असा निशाणाही राज ठाकरे यांनी लगावला.
राज यांचा वक्फ बोर्ड सुधारणेला पाठिंबा
advertisement
राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला पाठिंबा दिला आहे. एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे; वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरु आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे लक्षात येईल असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणं केली गेली आहेत. हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल असेही राज यांनी म्हटले.
advertisement
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे... यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय…
— Raj Thackeray (@RajThackeray) December 9, 2024
advertisement
वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसंच मुस्लिमेतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील या सुधारणांचा उल्लेख ही राज यांनी आपल्या पोस्टमध्ये केल्या.
विरोधकांच्या विरोधाला बळी पडू नका...
या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नसल्याचे राज यांनी म्हटले. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात 370 कलम हटवणं, तिहेरी तलाकवर बंदी आणणं, राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता असे राज यांनी सांगितले. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता, शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं.अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
advertisement
वक्फ बोर्डाने आपलं राष्ट्रीयत्व दाखवावं...
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी 'भूदान चळवळ' सुरु केली जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी, सरकारला परत केली होती जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल. हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा.. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं , असे आव्हान राज ठाकरे यांनी केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2024 1:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : लातूरमधील जमिनीवरील दावा प्रकरणावर राज ठाकरेंचे भाष्य, ''आता वक्फ बोर्डाने....''


