रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी। देह दंग सावळ्याच्या अंगणी।। पहिलं रिंगण संपन्न
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो वारकरी आणि भाविक दरवर्षी येतात. यंदासुद्धा वैष्णवांचा अत्यंत सुरेख असा मेळा पाहायला मिळतोय.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : लाखो वैष्णवांचा 'माऊली, माऊली' जयघोष अन् टाळ, मृदंगाचा आसमंत दणाणून सोडणारा निनाद, असं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य 8 जुलै रोजी साताऱ्यातील तरडगाव चांदोबाचा लिंब इथं दुपारी पावसात साडेचार वाजता पाहायला मिळालं. इथं अलोट उत्साहात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण पार पडलं.
लोणंद येथील 2 दिवसांचा मुक्काम आटोपून तरडगावच्या दिशेनं मार्गस्थ झाल्यानंतर परंपरेनुसार, पालखी सोहळ्यातील हे पहिलं रिंगण होतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो वारकरी आणि भाविक दरवर्षी येतात. यंदासुद्धा वैष्णवांचा अत्यंत सुरेख असा मेळा पाहायला मिळतोय.
advertisement
रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी। देह दंग सावळ्याच्या अंगणी।। या भक्तीगीताचा प्रत्यय देणारा सोहळा चांदोबाचा लिंब इथं पाहायला मिळाला. लोणंद येथील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीतळावर आगमन झालं तेव्हा ग्रामस्थांनी नैवेद्य अर्पण केला, मग मध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगा वाजताच माऊलींच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजवलेल्या रथात ठेवली आणि सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला.
advertisement
संपूर्ण पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणासाठी उत्सुकतेनं वारकऱ्यांची पावलं भराभर चांदोबाचा लिंबकडे पडत होती. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या स्थानिक नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. रस्त्याकडेला असलेल्या शेतांमध्ये ठिकठिकाणी भारूड आणि कीर्तन रंगले होते.
माऊलींचा रथ चांदोबाचा लिंब इथं आला असता अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवली होती. पळत आलेल्या दोन्ही अश्वांना पाहून वारकरी देहभान विसरून दंग झाले. पाहता-पाहता दोन्ही अश्वांनी माऊलींच्या रथाला प्रदक्षिणा घातली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. त्यानंतर अश्व मागील दिंड्यांपर्यंत गेल्यानंतर माघारी पळत आला. माऊलींच्या रथाजवळ आल्यानंतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माऊलींचा अश्व आणि मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्व दौडत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोहोचताच चोपदारांनी रथावर उभे राहून हातातील दंड फिरवून रिंगण संपन्न झाल्याचं दर्शवलं. यानंतर सोहळा माऊलींचा गजर करत पुढे मार्गस्थ झाला.
advertisement
चांदोबाचा लिंब इथल्या रिंगणाचं महत्त्व काय?
view commentsपूर्वी पाडेगाव रस्त्यावरून माऊलींची ही वारी जात असे, मात्र एकदा नीरा नदीत पादुकांना आंघोळ घालताना माऊलींबरोबर असलेले अश्व म्हणजेच घोडे सुटले आणि चांदोबाचा लिंब इथं येऊन थांबले. त्यानंतर माऊलींची वारी तरडगाव रस्त्यानं पंढरपूरच्या दिशेला जाऊ लागली. म्हणून हे रिंगण करण्याची परंपरा सुरू झाली, असं सांगितलं जातं.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
July 09, 2024 9:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी। देह दंग सावळ्याच्या अंगणी।। पहिलं रिंगण संपन्न

