सगळं जळून खाक झालंय.., ना मीडिया ना पोलिस, अजित पवारांच्या अपघाताची माहिती सर्वात आधी कुणाला मिळाली?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेनंतर आज, २९ जानेवारी रोजी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेनंतर आज (२९ जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देश–राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासूनच बारामतीत प्रचंड जनसागर उसळला असून, संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू
अजित पवार हे काल सकाळी खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. सकाळी सुमारे ८.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला या अपघाताबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. मात्र काही वेळातच विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले आणि ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.
advertisement
राजेश टोपे काय म्हणाले?
या अपघाताची माहिती सर्वात आधी माजी मंत्री आणि शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांना मिळाल्याचे समोर आले आहे. याबाबत स्वतः राजेश टोपे यांनी भावूक शब्दांत माहिती दिली. “माध्यमांकडे ही बातमी पोहोचण्याआधीच मला फोन आला होता. आमच्या जिल्ह्यातील एक तरुण बारामती विमानतळावर स्टोअर रूममध्ये काम करतो. त्याने सकाळी फोन करून सांगितले की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमानाचा शेवटचा भाग फक्त दिसतोय, उर्वरित सगळं जळून खाक झालं आहे,” असे टोपे यांनी सांगितले. “आज माझा वडीलधारा भाऊ गेल्यासारखी भावना आहे,” असे म्हणत ते अश्रूंना आवर घालू शकले नाहीत.
advertisement
पवार कुटुंबीय दिल्लीत
अपघाताच्या वेळी संपूर्ण पवार कुटुंब जवळपास दिल्लीत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सर्व दिल्लीमध्ये उपस्थित होते. दुर्घटनेची माहिती मिळताच पवार कुटुंबाने तातडीने बारामतीकडे धाव घेतली. कुटुंबातील सर्व घटकांना जोडणारा दुवा असलेल्या अजित पवारांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबाची वीण जणू उसवली आहे. राजकारण असो वा समाजकारण, प्रत्येक पातळीवर ठाम उभे राहणारा नेता हरपल्याची भावना आज सर्वत्र व्यक्त होत आहे.
advertisement
अंत्यसंस्काराचा कार्यक्रम
अजित पवारांचे पार्थिव बारामतीतील काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते.आज अत्यंयात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर समाप्त झाली.आणि सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात झाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सगळं जळून खाक झालंय.., ना मीडिया ना पोलिस, अजित पवारांच्या अपघाताची माहिती सर्वात आधी कुणाला मिळाली?







