नाद खुळा! शेतकरी कारमधून विकतो भाजी, लोक बघतच बसतात; उलाढाल लाखोंची
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हे अभ्यासपूर्ण करावे तर त्यातून उत्तम उत्पन्न मिळवता येतं असं तज्ज्ञ वारंवार सांगत असतात, याचाच अवलंब सौरभ यांनी केल्याचं दिसून येतं.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : वातावरण बदल हे शेतातल्या नुकसानीचं मोठं कारण आहेच. कधी कमी पाऊस पडला तरी पिकांचं नुकसान होतं आणि कधी जास्त पाऊस पडला तरी शेतकरी बांधवांना नुकसान सहन करावं लागतंच. शिवाय शेतमालाच्या विक्रीबाबतही काही समस्या असतात. व्यापाऱ्यांकडून शेतमाल विकण्यापेक्षा स्वतः बाजारात जाऊन केलेल्या विक्रीतून चांगला नफा मिळतो असा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येतो. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे सौरभ कोळेकर.
advertisement
सौरभ कोळेकर हे सोलापुरातील तरुण शेतकरी. ते रस्त्याच्या कडेला चक्क कार लावून भाजी विकतात. आपण बाजारात गेलो की, काही भाजीविक्रेते रस्त्यावर बसलेले दिसतात, तर काही भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या पाहायला मिळतात. अशात सौरभ यांची भाजीची कार पाहून ग्राहकही चकीत होतात. त्यातून ते ताजी मेथी आणि कोथिंबीर विकतात, त्यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांची गर्दी असते.
advertisement
सोलापूर शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर वाघोली हे गाव आहे. या गावातील शेतात पिकलेली मेथीची ताजी भाजी आणि कोथिंबीर सौरभ शहरातील विजापूर नाका येथील रस्त्यावर कार लावून विकतात. ते सांगतात, 2 रुपये, अडीच रुपये, 3 रुपये या किंमतीत कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीची पेंडी घेतली जाते. त्यामुळे नफा मिळत नाही, म्हणूनच शेतातून भाजी काढल्यानंतर स्वतः थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
advertisement
भाजीची 1 पेंडी तयार शेतातून काढण्यासाठी शेतमजुराला 1 रुपया, तर वाहतुकीसाठी 2 ते 3 रुपये द्यावे लागतात. एकाच पेंडीसाठी एवढा खर्च येत असेल तर बाजार समितीत 2 ते 3 रुपयांना ती पेंडी विकणं न परवडणारं आहे, असा विचार सौरभ यांनी केला. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी कार घेतली होती. या कारमधूनच ते भाजीविक्री करतात.
advertisement
कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 ते 3 रुपयांना विकली जाणारी 1 पेंडी सौरभ थेट ग्राहकांना 10 रुपयांना देतात. दिवसभरात 800 ते 900 पेंड्या विकल्या जातात, यातून खर्च वजा करून त्यांना दिवसाकाठी 4 ते 5 हजार रुपयांचा नफा होतो, याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली. दरम्यान, दिवसाचा नफा पाहता महिन्याकाठी त्यांची लाखो रुपयांची उलाढाल होत असणार हे नक्की. शिवाय शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हे अभ्यासपूर्ण करावे तर त्यातून उत्तम उत्पन्न मिळवता येतं असं तज्ज्ञ वारंवार सांगत असतात, याचाच अवलंब सौरभ यांनी केल्याचं दिसून येतं.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 29, 2024 10:04 AM IST