बालेकिल्ल्यातून घड्याळ गायब! 25 वर्षांत हे पहिल्यांदाच घडलं, जिल्ह्यात एकही उमेदवार का नाही?
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Assembly Election: राज्यातील 2 प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभा निवडणुकीत वातावरण चांगलंच तापलंय. पण एकेकाळी बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जिल्ह्यात पहिल्यांदाच घड्याळ चिन्हावर उमेदवार नाही.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव: राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानतंर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे एकेकाळचे स्वकीयच एकमेकांच्या पुढे उभे ठाकले आहेत. त्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतही यंदा वेगळी राजकीय समीकरणं दिसत आहेत. त्यामुळे एकेकाळी बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जिल्ह्यातून 25 वर्षांत पहिल्यांदाच घड्याळ हे चिन्ह गायब झाले आहे. लोकल18 च्या माध्यमातून याबाबतच आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
शरद पवार यांनी काँग्रेस पक्षापासून वेगळी चूल मांडत 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा राहिला. जिल्ह्यातील चारही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने लढवले. त्यातील उस्मानाबाद मतदारसंघातून डॉ. पद्मसिंह पाटील हे घड्याळ चिन्हावर विजयी झाले. तर 2 मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाला मानणारा मोठा गट होता, असं राजकीय विश्लेषक तानाजी घोडके सांगतात.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व राखलं. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेत देखील पक्षाचं वर्चस्व राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेतनंर सहा वेळा घड्याळ चिन्हाचा आमदार निवडून आला. 1999 व 2004 मध्ये डॉ. पद्मसिंह पाटील तर 2014 मध्ये राणाजगजितसिंह पाटील निवडून आले. तर दुसरीकडे परंडा मतदारसंघात 2004, 2009 आणि 2014 असं सलग 3 वेळा घड्याळ चिन्हावर राहुल मोटे निवडून आले होते.
advertisement
पहिल्यांदाच निवडणुकीत घड्याळ नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रत्येक निवडणुकीत घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे राहिले आहेत. परंतु, यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येथील एकही जागा आलेली नाही. त्यामुळे महायुतीसोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर यंदा एकही उमेदवार धाराशिवमधून लढत नाही. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षानंतर हे पहिल्यांदाच घडत असल्याचं राजकीय विश्लेषक घोडके यांनी सांगितलं.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Nov 07, 2024 3:30 PM IST
मराठी बातम्या/Politics/
बालेकिल्ल्यातून घड्याळ गायब! 25 वर्षांत हे पहिल्यांदाच घडलं, जिल्ह्यात एकही उमेदवार का नाही?






