महाराष्ट्रात पावसाचं आगमन, 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट, पुढील 24 तास धोक्याचे!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे उष्णता काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई : राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे उष्णता काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला उष्णतेचा पारा हा आता 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर पुण्यामध्ये दुपारपर्यंत निरभ्र आकाश राहणार असून त्यानंतर आकाश ढगाळ होण्यास सुरुवात होईल. पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये सकाळच्या वेळी धुके राहण्याची शक्यता असून त्यानंतर आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
राज्यातील जास्तीत जास्त कमाल तापमानाची नोंद मराठवाड्यात करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासांमध्ये 38 कमाल तापमान राहणार असून किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. तर आठवड्याच्या शेवटी मराठवाड्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 22, 2025 8:03 PM IST