निर्माल्यातून दरवळणार घरोघरी सुगंध, नागपुरातल्या गणेश मंदिराची आयडिया
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मंदिरात वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होऊन ते कचऱ्यात जाते. पण नागपुरातील गणेश मंदिराच्या उपक्रमामुळे घरोघरी सुगंध दरवळतोय.
नागपूर, 23 सप्टेंबर: देवाच्या चरणी मोठ्या भक्तीभावानं आणि श्रद्धेनं अर्पण केलेल्या हार, फुलांचं कालांतराने निर्माल्य होतं. हे निर्माल्य बहुधा कचऱ्यातच फेकून दिलं जातं. मात्र याच निर्माल्याचा पुरेपूर वापर करत त्यापासून सुगंधित धूपकांडी तयार करण्यात आलीय. नागपूर शहराचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराने हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे मंदिरात रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे 25 किलो धुपकांडी रोज तयार केली जात आहे. त्यामुळे बाप्पाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध घरोघरी दरवळणार आहे.
नागपूर वासियांचं श्रद्धास्थान
टेकडी गणेश मंदिर हे नागपूर वासियांचं श्रद्धास्थान आहे. शिवाय विदर्भातील अष्टविनायकपैकी हे प्रमुख स्थान आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात. गणेश चतुर्थी आणि इतर सण उत्सवांच्या काळात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. गणपतीला हार, फुले वाहत असतात. या फुलांचं निर्माल्य कचऱ्यात जातं. त्यामुळे अनेकदा भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे मंदिराच्या वतीने एक अनोखा उपक्रम सुरू कण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला.
advertisement
निर्माल्यापासून बनतोय धूप
भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलांचं निर्माल्य टाकून देण्याऐवजी त्यापासून सुगंधी धूप निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सध्या निर्माल्यापासून टेकडी गणपती मंदिरात एका दिवसात सुमारे 20 ते 25 किलो धूप तयार केले जात आहेत. हे धूप केवळ दहा रुपयांमध्ये मंदिरात येणाऱ्या भक्तांना उपलब्ध करून दिले जाते आहेत. या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या निर्माल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच त्यातून अनेकांसाठी रोजगार देखील मिळाला आहे.
advertisement
भाविकांच्या घरात दरवळतोय सुगंध
आम्ही निर्माल्यापासून धूपकांडी तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एक मशीन, एक शेड आणि चार-पाच लोकांची टीम तयार केली. आम्ही दिवसाला 25 ते 30 किलो तयार करतो आहे. धूपकांडी तयार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ तीन लाखापर्यंत खर्च आला. मंदिरातील निर्माल्य वापरून तयार करण्यात आलेल्या या धूपकांड्या परत भाविकांच्या देव्हाऱ्यात सुगंध दरवळणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती टेकडी गणेश मंदिराचे सचिव श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.
advertisement
अशी तयार केल्या जातात धूपकांडी
सर्वात आधी मंदिरात गोळा झालेले निर्माल्य हे काही दिवस वाळवले जाते. त्यानंतर निर्माल्य क्रशर मशीनमध्ये टाकून त्याची पावडर तयार केली जाते. त्यात प्रीमिक्स (गाईचं शेण,सुगंधी साहित्य) टाकून ते परत मशीनमध्ये मिक्स केलं जातं आणि त्यानंतर मशीनच्या मदतीने धूप- कांडी तयार केल्या जातात. निर्माल्यापासून धूप तयार करण्याचा प्रयोग वर्धा जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या आजनसराच्या 'भोजाजी महाराज' मंदिरात काही वर्षांपासून सुरू आहे, त्याचीचं माहिती घेऊन टेकडी गणेश मंदिरात हा उपक्रम राबवण्यात येत आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
September 23, 2023 11:49 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
निर्माल्यातून दरवळणार घरोघरी सुगंध, नागपुरातल्या गणेश मंदिराची आयडिया