छत्रपती संभाजीनगर : पाऊस मध्येच जोर धरतोय, मध्येच थांबतोय. त्यामुळे उष्ण-दमट वातावरणाचा खेळ सध्या सुद्धा आहे, असं म्हणायला हरकत नाही. अशात आपल्या आरोग्याचे हाल होऊ शकतात. शरिराला वातावरणातील बदल सहजपणे सहन होत नाहीत, त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असावी लागते. शिवाय पावसाळ्यात साथीचे आजार झपाट्यानं पसरतात, त्यामुळे काळजी घ्यायलाच हवी. पावसाळ्यात आरोग्य कसं जपावं, हे आज आपण आहारतज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
पावसाळी आजारांपासून दूर राहण्यासाठी आपला आहार कसा असावा, काय खावं, काय खाऊ नये याबाबत आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आपलं जेवण गरमागरमच असायला हवं. थंड अन्न खाणं टाळावं, शिवाय शिळे अन्नपदार्थ खाऊ नये. रस्त्यावर, उघड्यावरचं खाणं टाळावं. त्यावर धूळ, माती बसलेली असते. आपण खूपच पाणीपुरी, भेळपुरी प्रेमी असाल, तर हे पदार्थ घरी बनवून खावे.
हेही वाचा : Peach फळ खाल्लंय कधी? त्याची बी त्वचेपासून पोटापर्यंत असते गुणकारी
आहारात पालेभाज्यांचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर असतं. मात्र पावसाळ्यात या भाज्या खाऊ नये. कारण त्यावर धूळ, माती, किटाणू चिकटलेले असू शकतात. त्यामुळे या ऋतूत आपण शेवग्याच्या शेंगा, गवारची भाजी, चवळीच्या शेंगा, कडधान्य, इत्यादींचा आहारात समावेश करू शकता.
पावसाळ्यातच नाही, तर बाराही महिने आहारात ड्रायफ्रूट्स असणं फायदेशीर ठरतं. ड्रायफ्रूट्स रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास पचनशक्ती उत्तम राहते. शिवाय पाणी कायम उकळूनच प्यावं. जेवण झाल्यानंतर बडीशेप किंवा ओवा खावा. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचतं आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. खरंतर आहाराबाबतच्या या फार लहान सवयी आहेत, मात्र त्या लावून घेतल्या तर आजारपण दूर राहू शकतं.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.