फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी या गावात अडीच ते तीन हजार लोकसंख्या आहे. यातील निम्यापेक्षा जास्त लोक शेतवस्त्यांवर वास्तव्य करतात. गावात बनसोडे वस्ती, बहादुरी वस्ती, गोगाड बस्ती, लहानेवाडी वस्ती अशा अनेक वस्त्या आहेत. गावातून गिरिजा नदी वाहत असून या नदीच्या दोन्ही बाजूने लोकवस्ती आहे.
ग्रामस्थ उत्तम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना दळणवळणासाठी जाव धोक्यात घालावा लागतो. ग्रामस्थ थर्माकॉल आणि लाकडापासून बनवलेल्या तराफ्यावर बसून जीवघेणा प्रवास करतात. धक्कादायक बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना देखील अशाच प्रकारे जीव धोक्यात घालावा लागतो. नदीला जर पूर आला तर अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं.
advertisement
लोकल 18 शी बोलताना ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वर्षांच्या या महत्त्वाच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने आतापर्यंत तीन जणांचा या नदीत बळी गेला आहे.
दहा किलोमीटरचा फेरा वाचवण्यासाठी जीव धोक्यात
थर्माकॉलवर बसून जल प्रवासाविषयी ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांना विचारले असता ते म्हणाले की, जर नदीतून प्रवास केला नाही तर दहा किलोमीटरचा अंतरावरून फेरी मारावी लागते. यात वेळ आणि श्रम दोन्ही जास्त लागतात. त्यापेक्षा जीव धोक्यात घालून पाण्यातून केलेला प्रवास सोयीचा वाटतो.
पावसाळा सुरू झाल्यानंतर लहाण्याची वाडीचे दोन भागात विभाजन होते. नदीला पाणी आल्यानंतर अर्धे गाव इकडे आणि अर्धे गाव तिकडे अशी स्थिती निर्माण होते. दोन्ही भागांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. विशेष म्हणजे याच ठिकाणी दोन केटी बंधाने बांधल्याने पाण्याची साठवून राहण्याची क्षमता वाढली आहे. सध्या नदीची पाणीपातळी 10 ते 15 फूट आहे. येथील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या काठावरून जाताना पाय घसरल्याने तीन जणांचा मृत्यू देखील झाला आहे.