श्री. रा. चिं. ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी व्युत्पत्ती सांगितली आहे. देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘सुगिम्हअ' म्हणजे ‘सुग्रीष्मक' असे नाव दिले आहे. या नावापासून कोकण-गोमंतकात ‘शिग्मा' हा शब्द रूढ झाला. त्यानंतर त्याचे ‘शिमगा' असे रूप रूढ झाले आहे.
होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. कृष्ण लहान असताना त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठविले. दूध पीत असताना तिचा प्राण शोषून कृष्णाने त्या दुष्ट पूतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. त्याचे प्रतिक म्हणून होळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी पूतना राक्षसीला जाळण्यात येते. महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंढा राक्षसीन त्रास देत नाही, असा समज आहे.
advertisement
होळीनंतर 15 दिवसांनी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण! या राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार
आता यामागचे विज्ञान काय आहे ते पाहुया. होळीचा सण हा शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसात येतो. या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी! अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली. स्वच्छता झाली की रोगराईची ढुंढा राक्षसीण मुलांना त्रास देत नाही. त्याकाळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते, ही कल्पना नव्हती. तरी कोकणात फार प्राचीन कालापासून हा पालापाचोळा शेतातील भाजावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असत. म्हणून होलिकादहनाची प्रथा पडली आहे. आता लोक सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही याकडे पाहतात.
अस्वच्छताच राक्षसीण -
होळी हा सण स्वच्छतेसाठी आहे. घर, परिसर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. मनातील विकृती, घाण दूर करून मन स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी हा सण असतो. हा सण रंगांचा आहे पण तो केमिकल, हानीकारक रंगांचा नाही. तर नैसर्गिक रंगांचा आहे. मन आनंदी रहावं. दु:ख, द्वेष, मत्सर आणि सूडभावना दूर करून मन पवित्र रहावं यासाठी हा सण येत असतो.
हा 1 साधा मंत्र जीवनात शांती, सकारात्मकता आणेल; दररोज सकाळी करावा जप
वसंतऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो. “होळी जळाली, थंडी पळाली" असे म्हटले जाते. परंतु यावर्षी थंडी केव्हाच पळाली. यावर्षी तशी थंडी कमीच होती. हवामानात होणारा हा बदल चांगला नाही. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. निसर्गात होणाऱ्या या बदलाला अर्थात आपणच कारणीभूत आहोत. आपण जर निसर्गाला जपले नाही तर निसर्ग आपणास जपणार नाही. म्हणूनच पर्यावरणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे होळीचा सण साजरा करीत असतांना वृक्षतोड होणार नाही, याकडे आपण जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आपले सण-उत्सव पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. भक्षण करण्यासाठी नसतात.