पाणी कपात होणाचे कारण काय?
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी नेणारी 1000 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी सध्या नादुरुस्त झाली आहे. कल्याण फाटा परिसरात महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामादरम्यान ही जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी खराब झाली आहे. त्यामुळे ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
advertisement
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ही जलवाहिनी तातडीने दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र ही जलवाहिनी जुनी असून प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम अपेक्षेपेक्षा अधिक वेळ घेत आहे. सद्यस्थितीत हे काम पूर्ण होण्यासाठी अजून किमान चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
50 टक्के पाणी कपातीचा निर्णय
या बिघाडामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शहरात तात्पुरती 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेकडून झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
दिनांक 19 डिसेंबर 2025 पर्यंत शहरातील प्रत्येक भागाला दिवसातून केवळ 12 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. यामुळे काही भागांमध्ये कमी दाबाने किंवा अनियमित स्वरूपात पाणी मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
या सर्व कारणांमुळे नागरिकांनी पाण्याचा वापर अतिशय जपून करावा आणि पाणी साठवून ठेवावे तसेच अनावश्यक पाणी वाया घालवू नये असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.
