"मी मुलगा म्हणून लायक नाही", पोस्ट शेअर केली अन् ऋतुराजने संपवलं स्वतःला; मृत्यूनंतरही देहाची हेळसांड!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Sangali News : उच्चशिक्षित असूनही मानसिक तणाव आणि अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेल्या एका तरुणाने तासगाव तालुक्यातील मणेराजूरी गावात...
Sangali News : उच्चशिक्षित असूनही मानसिक तणाव आणि अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेल्या एका तरुणाने तासगाव तालुक्यातील मणेराजूरी गावात आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 32 वर्षीय ऋतुराज सुरेश पवार याने सोमवारी दुपारी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराने कुटुंबीयांच्या दुःखात आणखी भर पडली आहे.
आत्महत्येपूर्वीची शेअर केली भावनिक 'पोस्ट'
ऋतुराजने सोमवारी दुपारी 4 वाजता गावातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यात तो म्हणाला होता की, "नमस्कार, मी ऋतुराज. मी बऱ्याच दिवसांपासून मानसिक तणावाखाली होतो. माझी स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या, पण त्या पूर्ण करण्याचं ओझं मी माझ्या आई-वडिलांवर टाकलं. ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली. माझी मानसिक स्थिती खालावत गेली आणि गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे मी यातून बाहेर पडू शकलेलो नाही. माझ्या वडिलांना वयाच्या 63 व्या वर्षीही 12 तास काम करावं लागतं, याला मीच जबाबदार आहे. मी मुलगा म्हणून लायक नाही. माझ्याकडे शेअर मार्केट, क्रिप्टो मार्केट, फ्रीलान्सिंग, इंजिनिअरिंग डिग्री, जागतिक अर्थव्यवस्था यांचं ज्ञान असूनही मी माझ्या आई-वडिलांना काही देऊ शकलो नाही. माझ्या जिवलग मित्रांनो, तुम्ही माझ्या या स्थितीतही साथ दिलीत, याबद्दल मी आभारी आहे. पण आता माझी जाण्याची वेळ आली आहे", अशी पोस्ट ऋतुराजने लिहिली होती.
advertisement
ही पोस्ट पाहिल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला असता, गावाजवळच्या एका साठवण तलावाजवळ त्याचा मृतदेह आढळला. त्याने द्राक्ष बागेत वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर संताप
ऋतुराजचा मृतदेह रात्री 8 वाजता तासगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, पोस्टमॉर्टम करणारा कर्मचारी उपलब्ध नसल्याने मृतदेह 5 तास ताटकळत पडून होता. कर्मचाऱ्याने "मी येणार नाही," असे सांगितल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली. अखेर, रात्री 1 वाजता पलूस येथून दोन कर्मचारी बोलावल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आले.
advertisement
या गैरव्यवस्थेमुळे माजी जिल्हा परिषद सदस्य, बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सांगलीच्या सिव्हिल सर्जनकडे लेखी तक्रार दाखल केली असून, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना केवळ एका तरुणाच्या मृत्यूची नसून, ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची कमतरता आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
हे ही वाचा : आता तक्रार करणं झालं सोपं! कडेगावात 'ई-गव्हर्नन्स'चा अनोखा प्रयोग, सरकारी कामं होणार झटक्यात!
advertisement
हे ही वाचा : सायबर भामट्यांचा नवा डाव! ED आणि CBI अधिकारी बनून सांगलीतील दोघांना 37 लाखांचा चुना, कशी केली फसवणूक?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 2:18 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
"मी मुलगा म्हणून लायक नाही", पोस्ट शेअर केली अन् ऋतुराजने संपवलं स्वतःला; मृत्यूनंतरही देहाची हेळसांड!