Health Tips: दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं, आयुष्यात राहाल एकदम आनंदी VIDEO
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण सतत मानसिक तणाव आणि चिंतेने ग्रस्त आहेत. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये चिंता, झोपेची समस्या आणि बेचैनी वाढत चालली आहे.
बीड: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण सतत मानसिक तणाव आणि चिंतेने ग्रस्त आहेत. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये चिंता, झोपेची समस्या आणि बेचैनी वाढत चालली आहे. ही स्थिती दीर्घकाळ टिकल्यास ती नैराश्य, झोपेचे विकार आणि इतर मानसिक आजारांमध्ये रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. बीड येथील डॉ. डी.के.मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिंता कमी करण्यासाठी नियमित ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी ही प्रभावी उपाययोजना ठरते.
डॉ. मुंडे यांच्या मते दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे ध्यान किंवा मेडिटेशन केल्यास मन शांत राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात. त्यासोबतच अनुलोम-विलोम, भस्त्रिका यांसारखे श्वसनाचे व्यायाम मेंदूतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून चिंता नियंत्रित करण्यात मदत करतात. दिवसभरात थोडा वेळ चालणे, सायकलिंग किंवा हलका व्यायाम केल्याने हॅप्पी हार्मोन्स म्हणजेच एंडोर्फिन्स वाढतात आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.
advertisement
चांगल्या झोपेसाठी झोपण्यापूर्वी मोबाईलपासून दूर राहणे, झोपेची ठराविक वेळ पाळणे आणि हलका आहार घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास माणसाची चिडचिड वाढते आणि चिंता अधिक तीव्र होते. याशिवाय आपले विचार, चिंता आणि मनातील अस्वस्थता एका डायरीत लिहून काढल्याने मन हलकं होतं. यामुळे मन मोकळं होतं आणि तणाव कमी होतो.
advertisement
अनेकदा आपल्याला वाटते की प्रत्येक गोष्ट आपल्या हातात असते, पण प्रत्यक्षात काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे. नकारात्मक विचारांना थांब म्हणणे आणि मी मजबूत आहे, सर्व ठीक होईल अशा सकारात्मक वाक्यांचा सतत उच्चार केल्यास आत्मविश्वास वाढतो. छंद जोपासणे, निसर्गात वेळ घालवणे, संगीत ऐकणे यासारख्या सवयी चिंता कमी करण्यास मदत करतात.
advertisement
जर चिंता खूपच तीव्र असेल, झोप लागत नसेल किंवा कामात अडथळा येत असेल, तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही कोणतीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नसून, उपचारांद्वारे चिंता कमी करता येते. वेळेत उपाययोजना केल्यास चिंता पूर्णपणे बरी होऊ शकते आणि जीवन पुन्हा आनंददायी बनू शकते, असं डी.के.मुंडे सांगतात.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Jul 12, 2025 6:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं, आयुष्यात राहाल एकदम आनंदी VIDEO








