CJI Bhushan Gavai: मला प्रोटोकॉलचे कौतुक नाही, आताही नागपूरला दुचाकीवरून फिरतो पण... CJI गवई यांचे खडे बोल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
CJI Bhushan Gavai Felicitation Program Mumbai: महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांच्या हातात देशाच्या न्यायपालिकेची जबाबदारी गेल्याने महाराष्ट्र आणि गोवा वकील संघटनेने रविवारी सत्काराचे आयोजन केले.
मुंबई : देशाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर न्यायमुर्ती भूषण गवई पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर होते. मात्र मुंबईत त्यांच्या स्वागताला प्रशासकीय आणि पोलीसप्रमुख नसल्याने त्यांनी जाहीर भाषणात नाराजी व्यक्त करून नोकरशाहीचे कान उपटले. हा माझ्या सन्मानाचा प्रश्न नाही. पण राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख जेव्हा एखाद्या राज्यात येत असेल त्यावेळी घटनेच्या दुसऱ्या संस्थेकडून दिलेल्या वागणुकीचा हा प्रश्न आहे, अशा शब्दात न्यायमुर्ती गवई यांनी शिष्टाचारावरून नोकरीशाहीला सुनावले.
महाराष्ट्रातील मूळचे अमरावतीचे असलेले न्या. भूषण गवई यांनी १४ मे रोजी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या हातात न्यायपालिकेची जबाबदारी गेल्याने महाराष्ट्र आणि गोवा वकील संघटनेने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले. मुंबईत झालेल्या खास सोहळ्यात न्या. गवई यांना सन्मानित करण्यात आले. परंतु या सोहळ्याला नोकरशाहीकडून सरन्यायाधीशांना न दिलेल्या शिष्टाचाराच्या नाराजीची किनार राहिली. सरन्यायाधीश गवई यांनी ही नाराजी जाहीर भाषणातून बोलून दाखवली.
advertisement
मुद्दा माझ्या अवमानाचा नाही पण संविधानाच्या एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेला दिलेल्या वागणुकीचा!
सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, मला राजशिष्टाचाराचे मुळीच कौतुक नाही. मी आजही अमरावती नागपूरला जातो तेव्हा मित्रांच्या दुचाकीवरून फिरतो. नागपूर अमरावतीला जाताना कधीही पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. मला त्याचे अजिबात विशेष कौतुक नाही. पण न्यायपालिकेचा प्रमुख एखाद्या राज्यात येत असेल, ते ही त्याच्या स्वत:च्या राज्यात, तेव्हा संविधानाच्या एका संस्थेकडून (नोकरशाही) दुसऱ्या संस्थेला कशी वागणूक दिली जाते, हा मूळ प्रश्न आहे.
advertisement
सरन्यायाधीश महाराष्ट्र दौऱ्यावर येत असताना राज्याचे मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त यांना उपस्थित राहू वाटत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु ही वागणूक योग्य आहे का? याचा त्यांनी जरूर विचार करावा, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
सरन्यायाधीश गवई यांची जाहीर नाराजी, अधिकाऱ्यांची धावाधाव, पुढच्या तासात दादरला हजर
advertisement
सरन्यायाधीश गवई यांनी भाषणातून जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी तत्काळ दादर गाठले. दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर अर्थात चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी गेलेले सरन्यायाधीश गवई यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेत दिलगिरी व्यक्त केली. वरिष्ठ अधिकारी दिलगिरी व्यक्त करीत असतानाची क्षणचित्रे समाज माध्यमांवर वेगाने पसरली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 19, 2025 7:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CJI Bhushan Gavai: मला प्रोटोकॉलचे कौतुक नाही, आताही नागपूरला दुचाकीवरून फिरतो पण... CJI गवई यांचे खडे बोल