Raj Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Jayanti : 'मुंबईत मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना...' आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

Last Updated:

Raj Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Jayanti : . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून राज ठाकरे यांनी मराठीजनांना आव्हानही केले आहे.

News18
News18
मुंबई: भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचा उत्साह देशभरात दिसून येत आहे. भारतातील जाती व्यवस्थेविरोधात एल्गार करून कोट्यवधींची शोषणातून मुक्त करणाऱ्या महामानवाला जयंतीच्या निमित्ताने अभिवादन केले जात आहे. भीम जयंतीच्या उत्साहासह त्यांच्या विचारांचा जागर केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून राज ठाकरे यांनी मराठीजनांना आव्हानही केले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्याला बाबासाहेबांनी दिलेला पाठिंबा यावर भाष्य करताना मुंबईत सध्या मराठी माणसाच्या मुंबईतील स्थितीबाबत त्यांनी लक्ष वेधले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुढे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता येणार नाही असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.
advertisement
आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल, अशा शब्दात राज ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन केले आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट काय म्हटले?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं आवश्यक आहे.
advertisement
संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितलं होतं. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनलं. या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे.
advertisement
स्वतः बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९४८ रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठींबा देणारं निवेदन दिलं होतं. या निवेदनात मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे याचं विस्तृत विवेचन आहे. आणि हे विवेचन Maharashtra As A Linguistic Province मध्ये वाचता येईल.
हे सगळं सविस्तर सांगायचं कारण असं की बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणं केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही.
advertisement
advertisement
पुढे बाबासाहेबांचं निधन झालं. पण त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांच्यासारखे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने उतरले. बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवायांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मोरारजी देसाईंना जेरीस आणलं होतं.
पुढे १९६० ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता येणार नाही.
advertisement
आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ?
आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Jayanti : 'मुंबईत मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना...' आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement