Thane Traffic: बाप्पा पावला! गणेशोत्सवात ठाणेकरांची ट्रॅफिक कोंडीतून होणार सुटका, अवजड वाहनांना प्रवेश बंदी
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Thane Traffic: गणेशोत्सवकाळात, विशेषत: विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
ठाणे : सर्वांच्या लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन झालं आहे. 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेकांनी आपल्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. काहीजण दीड दिवसांचा, काही जण पाच दिवसांचा तर काही जण 10 दिवसांचा गणपती बसवतात. काही ठिकाणी गौरीसोबत सातव्या दिवशीच गणपती विसर्जन केलं जातं. ही बाब लक्षात घेऊन ठाण्यातील वाहतुक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवकाळात, विशेषत: विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतुकीतील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी (26 ऑगस्ट) आदेश जारी केले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ठाण्यातील समिती सभागृहात रस्ता सुरक्षासंदर्भात बैठक पार पडली. सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करा. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून यंत्रणांनी एकत्रित समन्वय राखून कार्य करा, असे निर्देश विविध विभागांतील अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत. याशिवाय, मदत पुरवठा तत्परतेने होण्यासाठी ड्युटी चार्ट तयार करून मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.
advertisement
ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात अवजड वाहनांना गणेशोत्सवाच्य कालावधीत दिवसा बंदी घातली आहे. मालवाहू वाहनांना केवळ रात्री आणि पहाटेच्यावेळी प्रवेश दिला जाणार आहे तसेच 28, 31 ऑगस्ट 2 आणि 6 सप्टेंबर या दिवशी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
advertisement
या बैठकीला पोलास अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने पालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
याशिवाय, भिवंडी शहरात अवजड वाहनांना कायमस्वरुपी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भिवंडी शहरात अनेक मोठ्या कंपन्यांची गोडाऊन आहेत. त्यामुळे या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झालं आहे. या गोदामांमधील मालाची वाहतूक करण्यासाठी दररोज हजारो अवजड वाहनांची भिवंडीत ये-जा असते. या वाहनांमुळे भिवंडीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा दोन ते तीन तास ताटकळत उभे राहावे लागते. नागरिकांना या वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेच्यावतीने शहरात अवजड वाहनांना वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घातल्याची माहिती वाहतूक विभाग उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
August 28, 2025 9:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Traffic: बाप्पा पावला! गणेशोत्सवात ठाणेकरांची ट्रॅफिक कोंडीतून होणार सुटका, अवजड वाहनांना प्रवेश बंदी


