'मानव सेवा हीच ईश्वरसेवा', या संस्थेकडून वारकऱ्यांचे पाय दिले जातात चोळून!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
दिवसाला कमीत कमी 500 हून अधिक लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न असतो. तसंच दिवसभरात 2500 ते 3 हजार लोकांसाठी ओपीडीदेखील सुरू असते.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : श्री संत महाराजांच्या पालख्यांचा विठ्ठलभेटीसाठी पंढरपूरच्या वाटेवरून प्रवास सुरू आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रासह देशभरातील लाखो वारकरी विठ्ठलभेटीसाठी मोठ्या उत्साहानं चालत आहेत. ऊन असो, वारा असो, पाऊस असो मुखी 'विठ्ठल-विठ्ठल' जयघोष आणि हाती टाळ-मृदंगाचा निनाद असा हा अत्यंत प्रसन्न प्रवास सुरू आहे. वारकऱ्यांना, भाविकांना या प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी प्रशासनाकडून चोख व्यवस्था केलेलीच आहे. शिवाय काही स्वयंसेवी संस्थासुद्धा वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतात.
advertisement
'मानव सेवा हीच ईश्वरसेवा' हे ब्रीदवाक्य पाळून वारीमधील लाखो वारकरी आणि भाविकांची सेवा वैष्णवी ट्रस्टकडून केली जातेय. वारकऱ्यांचा विठ्ठलभेटीचा पायी प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्यांच्या पायाला मसाज करून देणं, सूज आली असेल तर त्यावर औषधोपचार करणं, इतर कोणते आजार झाले असतील तर त्यावर शक्य असल्यास उपचार करणं, अशी विविध सेवा या ट्रस्टकडून केली जाते. विशेष म्हणजे यानिमित्तानं आपल्यालाही वारीत सहभागी होता येतं याचं त्यांना समाधान वाटतं. मागील 30 ते 31 वर्षे ट्रस्टकडून वारीसाठी ही सेवा अविरतपणे सुरू आहे.
advertisement
आमच्यासोबत अनेक औषधी संस्था, काही वैयक्तिक लोक, काही व्यापारी जोडलेले आहेत, त्यांच्याच मदतीतून आम्ही वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करू शकतो. कोणाला अशक्तपणा आला असेल तर त्यांना सलाईनदेखील लावली जाते. ही मदत करून आम्हाला खूप आनंद मिळतो आणि वारकऱ्यांची वारी पूर्ण व्हावी यासाठी आम्हाला सेवा देण्याची संधी मिळते, याचं फार मोठं समाधान वाटतं. बदलत्या वातावरणात अनेक वारकरी आजारी पडतात, त्यांना आम्ही बरं करतो. दिवसाला कमीत कमी 500 हून अधिक लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न असतो. तसंच दिवसभरात 2500 ते 3 हजार लोकांसाठी ओपीडीदेखील सुरू असते, असं वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितलं.
advertisement
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात तरडगाव इथं मुक्कामी आहे. याच लोणंद नगरीत वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा वैष्णवी ट्रस्टद्वारे करण्यात येते. विशेषतः चालून चालून थकले असतील, या विचारातून वारकऱ्यांचे पाय चोळून दिले जातात.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
July 09, 2024 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
'मानव सेवा हीच ईश्वरसेवा', या संस्थेकडून वारकऱ्यांचे पाय दिले जातात चोळून!