Solapur: दोन्ही लेकांना मोठं केलं, त्यांनीच घराबाहेर काढलं, 75 वर्षांच्या आजोबांनी अशी घडवली अद्दल, Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Parents Care: वृद्ध आई-वडिलांना दोन्ही लेकांनी घराबाहेर काढलं. सोलापूरच्या 75 वर्षीय आजोबांनी दोघांनाही चांगलाच धडा शिकवला.
सोलापूर: सध्याच्या काळात आई-वडील आणि मुलं या चौकोनी कुटुबात घरांतील ज्येष्टांना अडगळीत टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच काहीशी गटना सोलापुरातील बार्शी तालुक्यात घडलीये. दोन्ही मुलांना मोठं करून त्यांची लग्न करून दिली. पण त्यांनी वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढलं. तेव्हा थेट प्रांताधिकाऱ्यांकडे धाव घेत 75 वर्षांच्या आजोबांनी दोन्ही लेकांना चांगलीच अद्दल घडवली.
नेमकं काय घडलं?
75 वर्षीय सुभाष लक्ष्मण बुरगुटे आणि पत्नी शकुंतला बुरगुटे हे दाम्पत्य बार्शी तालुक्यातील उपळेदुमाला गावचं रहिवासी आहेत. त्यांना दोन मुलं असून जयंत आणि यशवंत अशी त्यांची नावे आहेत. तर मुलगी जयश्री हिचाही विवाह झाला आहे. वृद्ध आई-वडिलांना मुलगा जयंत याने 2020 मध्य घराबाहेर काढलं. तेव्हा हे वृद्ध दाम्पत्य दुसरा मुलगा यशवंतकडे राहायला गेले.
advertisement
यशवंत याने दोन वर्ष आई-वडिलांचा सांभाळ केला. पण पुढे परस्थिती बदलली. आपल्याला सांभाळ करणं शक्य नसल्याचं त्यानं सांगितलं. तेव्हा सुभाष बुरगुटे यांनी 18 जुलै 2025 रोजी प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याकडे मुलं सांभाळत नसल्याबाबत अर्ज केला. त्या अर्जाची दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांना लेखी म्हणणे सादर करण्याची संधी दिली.
advertisement
तक्रारीत काय?
“उपळे दुमाला, झाडी, पिंपरी (आर), निंबळक या गावांच्या हद्दीत 13 एकर 17 गुंठे बागायत जमीन आहे. तसेच उपळे दुमाला येथे राहते घर आहे. या बागायत जमिनीतून 2005 पासून आई-वडिलांना बेदखल करण्यात आलं असून मुले जयंत आणि यशवंत हे दोघे 50-50 टक्के हिस्सा घेतात,” असं सुभाष यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.
advertisement
मुलांचं म्हणणं...
प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार पहिला मुलगा जयंतने आपलं म्हणणे सादर केलं नाही. परंतु, यशवंतने आपलं म्हणणे सादर केलं. “शेतीत होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार नापिकीला सामोरं जावं लागतं. यंदा अतिवृष्टीनं देखील शेतीचं नुकसान झालंय,” असं यशवंतनं सांगितलं.
प्रांताधिकाऱ्यांनी दिला न्याय...
मुलांचं म्हणणं ऐकल्यानंतर प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी उपळेदुमाला येथील घर आई-वडिलांना देण्यास सांगितलं. तसेच वडिलोपार्जित 13 एकर 17 गुंठे जमिनीतील 50 टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना देण्याचे आदेश दिले. प्रत्येक मुलाने आपल्या आई-वडिलांचा आदर करावा, त्यांचा मान राखावा, त्यांचा योग्य सांभाळ करावा अन्यथा वडिलांनी दिलेली मालमत्ता रद्द करून पुन्हा पालकांच्या नावावर करण्यात येईल, असे प्रांत अधिकारी पडदुणे यांनी म्हटले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Nov 15, 2025 2:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur: दोन्ही लेकांना मोठं केलं, त्यांनीच घराबाहेर काढलं, 75 वर्षांच्या आजोबांनी अशी घडवली अद्दल, Video






