Mumbai Water: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांबाबत मोठी अपडेट, ऐन पावसाळ्यात पाणी घटलं!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Water: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांबाबत महत्त्वाचं अपडेट पाणीपुरवठा विभागाने दिले आहे. मोडक सागर आणि तानसा तलावांत पाणीसाठ्यात घट झालीये.
मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तलावांतील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. मोडक सागर व तानसा या दोन्ही तलावांत मिळून सुमारे 8 हजार दशलक्ष लिटर पाण्याची घट नोंदवण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे 9 जुलै रोजी तानसा तर 23 जुलै रोजी मोडक सागर ओसंडून वाहू लागले होते. तेव्हा हे दोन्ही तलाव 100 टक्के भरले होते. मात्र सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने मोडक सागरचा साठा 1,23,417 दशलक्ष लिटर व तानसाचा साठा 1,42,063 दशलक्ष लिटर इतका झाला आहे.
मध्य वैतरणा तलावातील साठ्यातही घट झाली असून, 8 ऑगस्ट रोजी या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सध्या मुंबईच्या सातही तलावांतील मिळून एकूण पाणीसाठा 89.17 टक्के इतका असून, गेल्या वर्षी याच कालावधीत (11 ऑगस्ट 2024) हा साठा 92.20 टक्के होता. म्हणजेच सध्या साठा 3 टक्क्यांनी कमी आहे. सर्व तलाव 1,57,000 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
advertisement
दरम्यान, पालिकेच्या जल अभियंता विभागाने ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्व तलाव सप्टेंबर अखेरीस पूर्ण क्षमतेने भरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
बारवी धरणात 96 टक्के पाणी
ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातही 96 टक्के पाणीसाठा झाला असून, आतापर्यंत 1993 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात 339.840 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून, मागील वर्षी 9 ऑगस्ट रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2025 1:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांबाबत मोठी अपडेट, ऐन पावसाळ्यात पाणी घटलं!