अजित पवारांनी पुन्हा पुण्याच्या कारभाऱ्यांना शिंगावर घेतलं, 'सिंचन'ची आठवण करून दिल्यावरही भाजपवर हल्लाबोल सुरूच
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पुणे महानगरपालिकेचा प्रचारासाठी अजित पवार यांनी पुण्यातच तळ ठोकला आहे. अजित पवार हे रोज दोन-तीन सभा घेऊन भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढत आहेत.
पुणे : पुण्यातील रस्ते खराब आहेत. कचऱ्याचे ढीग साचले आहेत, शुद्ध पाणी मिळेना, प्रदूषण वाढले आहे. भाजपच्या सत्ता काळात भ्रष्टाचार करण्याशिवाय कारभाऱ्यांनी दुसरं काहीही केलेले नाही. मागील नऊ वर्षे महानगरपालिकेची सूत्रे ज्यांच्या हातात होती, त्यांनी जवळपास पाऊण लाख कोटी रुपये खर्च केले, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस विकासकामे दिसत नाहीत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
पुणे महानगरपालिकेचा प्रचारासाठी अजित पवार यांनी पुण्यातच तळ ठोकला आहे. अजित पवार हे रोज दोन-तीन सभा घेऊन भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने निधी दिला पण पुण्यातील कारभाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराचा विकास झाला नसल्याचे सांगत कारभारी बदलण्याचे आवाहन ते सभांमधून करीत आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी भाजपला कोंडीत पकडल्यानंतर भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून दिली. मात्र त्यानंतरही अजित पवार यांची भाजपविरोधात तलवारबाजी सुरूच आहे.
advertisement
अजितदादांचा भाजपवर हल्लाबोल सुरूच
माझ्या विचारांचे नगरसेवक-नगरसेविका तुम्ही निवडून द्या. मी चांगले प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करेन. पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवण्यावर भर दिला जाईल. अलीकडच्या काळात पुण्यात वाढलेली गुंडगिरी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दहशतीचे प्रकार चिंताजनक आहेत. पुणे हे देश-राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या लोकांचे शहर आहे. प्रत्येकाला येथे राहण्याचा आणि काम करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. जातीय सलोखा आणि एकोपा निर्माण करणे आवश्यक आहे. निवडणुकीत कोणत्याही दबावाला, ताकद किंवा भीतीला बळी न पडता मतदान करा. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना पुण्याला पाणीपुरवठा केला, मात्र नंतर आवश्यक ती पुढील कामे झाली नाहीत. पुण्यात मेट्रो प्रकल्प आणला, आता त्याची पुढील कामे गतीने पूर्ण करायची आहेत. पीएमपीएमएलसाठी अधिक बसेस घेण्याचा निर्णय, सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यावर भर, 2026 मध्ये नवीन महानगरपालिका अस्तित्वात येत आहे. त्यामुळे अनेक वर्षे आपल्या भागासाठी काम करणारे कार्यकर्ते, माझी लाडकी बहीण, वडीलधारी बांधव आज थांबलेले आहेत. म्हणूनच या निवडणुका आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मी अनेक सर्वेक्षणे केली आहेत. मला प्रशासनाचा अनुभव आहे. मागील नऊ वर्षे महानगरपालिकेची सूत्रे ज्यांच्या हातात होती, त्यांनी जवळपास पाऊण लाख कोटी रुपये खर्च केले, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस विकासकामे दिसत नाहीत.
advertisement
कोट्यवधी खर्च झाले पण पुणेकरांच्या जीवनात सुधारणा झालेली नाही
आज पुण्यात रस्ते खराब आहेत, कचऱ्याचे ढीग दिसत आहेत, प्रदूषण वाढले आहे, स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही एवढा प्रचंड खर्च होऊनही पुणेकरांच्या जीवनात सुधारणा झालेली नाही. म्हणजेच या कारभारात अपयश आले आहे. सफाई व्यवस्थेतील गंभीर गैरव्यवहार, पुण्यामध्ये रोज 12,350 सफाई कामगार काम करतात असे कागदोपत्री दाखवले जाते. यामध्ये 7,000 पालिकेचे परवानाधारक आणि सुमारे 5,350 कंत्राटी कामगार दाखवले जातात. मात्र प्रत्यक्षात अनेक कामगार मैदानात दिसतच नाहीत. केवळ बोगस नावे दाखवून कोट्यवधींची बिले काढली जात आहेत. हे पैसे तुमच्या-माझ्या पुणेकरांच्या खिशातून जात आहेत. याबाबत माझ्याकडे संपूर्ण कागदपत्रे आणि ठोस पुरावे उपलब्ध आहेत. मी पुराव्यांवरच बोलतो, खोटी गोष्ट मांडत नाही. कोणत्याही पदावर असलो तरी मी कामात कमी पडणार नाही. केंद्र, राज्य आणि जिल्हा वार्षिक योजनेतून निधी आणला जाईल. सीएसआर निधीचा वापर केला जाईल. प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी खर्च होतोय का, यावर काटेकोर लक्ष ठेवले जाईल. मी दर आठवड्याला पुण्यात येऊन आढावा घेईन. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुणेकरांना चांगल्या सेवा दिल्या जातील. शेवटची विनंती, उद्याच्या 15 तारखेला कोणताही भेदभाव न करता कोणत्याही दबावाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा. प्रलोभन, दबाव, अफवा यांना घाबरू नका. बदलासाठी ठाम भूमिका घ्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 8:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांनी पुन्हा पुण्याच्या कारभाऱ्यांना शिंगावर घेतलं, 'सिंचन'ची आठवण करून दिल्यावरही भाजपवर हल्लाबोल सुरूच











