शाळेत असतानाच पाहिलं होतं IAS होण्याचं स्वप्न, अन् कठीण परिस्थितीतही तिनं करुनच दाखवलं! वृषालीची प्रेरणादायी गोष्ट
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
- local18
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वृषाली सांगते की, दररोज दिवसभरात दहा तास अभ्यास करण्याचा प्रयत्न असायचा. यामध्ये मागच्या वर्षभरात नेहमी सातत्य राखले. मागच्या दोन्ही प्रयत्नात जरी यशस्वी होऊ शकत नसले, तरी त्यातून खूप काही शिकायला मिळाले.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बरेच जण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. मात्र, आपल्या प्रयत्नांमध्ये काहीच जण यशस्वी होत असतात. वृषाली कांबळे ही त्यापैकीच एक मुलगी आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून दिवस काढत तिने आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. यूपीएससी परीक्षेत तिने देशभरातून 310 वा रँक मिळवला आहे. त्यामुळे आई-वडिलांसह सर्वांकडूनच कौतुकाची थाप तिच्या पाठीवर पडत आहे.
advertisement
कोल्हापुरातील आजरा तालुक्यात उत्तुर हे एक छोटेसे गाव आहे. याच ठिकाणी वृषालीचे वडील संतराम कांबळे आपल्या परिवारासह राहात होते. मात्र, कामानिमित्त आणि मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईच्या नेरुळ परिसरात वृषालीचे बालपण गेले. तर तिने तिचे माध्यमिक शिक्षण हे नेरुर येथील सेंट ऑगस्टीन हायस्कूलमध्ये आणि राज्यशास्त्र विषयातून फोर्ट येथील सेंट झिविअर्स कॉलेजमधून बीएची पदवी मिळवली. घरची परिस्थिती बघून आणि आईपासून प्रेरणा घेऊन शाळेत असतानाच आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केल्याचे वृषाली सांगते.
advertisement
अथक प्रयत्नांती यश -
घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे आणि त्यात मुंबईसारख्या शहरात स्पर्धा परीक्षेचे फारसे चांगले वातावरण नाही आहे. तरीदेखील वृषालीचे यूपीएससीसाठी प्रयत्न सुरुच होते. यादरम्यान घरची परिस्थिती सुधारण्यासाठी आई लहान मुलांच्या शिकवण्यादेखील घ्यायची. यातूनच मला अजून जोमाने तयारी करावी असे वाटायचे. त्यातच 2021 आणि 2022 साली यूपीएससीच्या परीक्षेत मला पूर्व परिक्षेतच अपयश आले. मात्र, हार न मानून मी पुन्हा तयारीला लागले होते आणि त्यामुळेच मला 2023 च्या परीक्षेत यश मिळाले., असे वृषालीने सांगितले आहे.
advertisement
कसा केला अभ्यास..?
वृषाली सांगते की, दररोज दिवसभरात दहा तास अभ्यास करण्याचा प्रयत्न असायचा. यामध्ये मागच्या वर्षभरात नेहमी सातत्य राखले. मागच्या दोन्ही प्रयत्नात जरी यशस्वी होऊ शकत नसले, तरी त्यातून खूप काही शिकायला मिळाले. या चुकांमधून शिकताना एक चांगली व्यक्ती होण्यासाठी मदत झाली. त्या चुका बाजूला करून स्वतःमध्ये सुधारणा करता आल्या. हे सर्व करण्यासाठी बार्टी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या शिष्यवृत्तीमुळे आणखी बळ मिळाले. शिष्यवृत्ती मिळवून मी दिल्लीला अभ्यासासाठी गेली होती. आत्ता मिळवलेल्या यशासाठी तिकडे घेतलेल्या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाल्याचेही वृषाली यांनी सांगितले आहे.
advertisement
दरम्यान मिळालेले यश हे आई-वडिलांना समर्पित आहे. कारण त्यांचा या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. लहानपणापासूनच नेहमी त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत आले आहे. तुम्ही काहीही काम वगैरे करायची गरज नाही. तुम्ही मोठे व्हा म्हणजे त्यातच आमची स्वप्ने पूर्ण होतील, असे ते सांगायचे. या सगळ्यांमुळेच आज मी इतकी यशस्वी आहे, असेही वृषालीने स्पष्ट केले आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Apr 24, 2024 10:39 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
शाळेत असतानाच पाहिलं होतं IAS होण्याचं स्वप्न, अन् कठीण परिस्थितीतही तिनं करुनच दाखवलं! वृषालीची प्रेरणादायी गोष्ट








