मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा, मनसे संतापली, भाजपविरोधात एल्गार, जिथे त्यांचा मोर्चा तिथेच....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Non Marathi Traders Morcha Mira Bhayandar: गुरूवारी मीरा भाईंदरमधली दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाविरोधात मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
मीरा भाईंदर : महाराष्ट्रात हिंदीसक्तीच्या विरोधात वातावरण पेटलेले असताना मीरा भाईंदरमध्ये मराठीत न बोलणाऱ्या एका व्यापाऱ्याला भाषेच्या मुद्द्यावरून मनसैनिकांनी चोप दिला. या घटनेविरोधात मीरा भाईंदरच्या अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात मोर्चा काढला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात मोर्चा काढून झालेल्या घटनेचा निषेध नोंदवत मारहाण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. गुरूवारी मीरा भाईंदरमधली दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. गुजराती व्यापाऱ्यांच्या याच मोर्चाविरोधात मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसेचे नेते, पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत व्यापाऱ्यांच्या मोर्चाच्या नियोजनामागे भाजपचा हात होता, असा उघड गंभीर आरोप केला. मतांच्या राजकारणासाठी भाजपने हे सर्व घडवून आणले, त्यांना मराठी माणसांचे काही पडलेले नाही. मराठी माणसापुढे भाजपला झुकावे लागले, अध्यादेश रद्द करावा लागला. त्याचाच राग म्हणून भाजपने आजचा मोर्चा काढला, असे अविनाश जाधव म्हणाले.
advertisement
व्यापाऱ्यांचा मोर्चा नसून भाजपचा मोर्चा होता, पण आम्हीही मागे हटणार नाही
"मीरा भाईंदरमध्ये आजचा झालेला मोर्चा भारतीय जनता पक्ष प्रेरित होता. बळजबरी व्यापारी जमा करण्यात आले. भाजपचा त्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसले. मराठी माणसांच्या विरोधात भाजपने आंदोलन घडवून आणले. भाजपने मराठी माणसांचा अपमान केला? केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजपने आजचा मोर्चा काढला. पण आम्हीही भाजपच्या मोर्चाविरोधात येथील आगरी कोळी समाजाला तसेच मराठी माणसाला एकत्र करून मोर्चा काढणार आहोत. तो मोर्चा भाजपच्या विरोधात असेल", अशी मोठी घोषणा अविनाश जाधव यांनी केली.
advertisement
मनसैनिक व्यापाऱ्याशी प्रेमाने बोलत होते पण तो उर्मट होता
व्यापाऱ्याला मारहाण झालेल्या घटनेवर विचारले असता, "आमचे महाराष्ट्र सैनिक त्याला नम्रपणे विचारीत होते, त्याच्याशी बोलत होते. परंतु महाराष्ट्रात सगळ्या भाषा चालतात, असे उद्धट उत्तर त्याने दिले. असे उत्तर ऐकल्यावर महाराष्ट्र सैनिक कसे शांत बसतील? आम्ही आमच्या भाषेसाठी कडवट आहोत, हे सगळे जाणतात. आमच्याशी चार शब्द मराठीत प्रेमाने बोलावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. व्यापाऱ्याची उत्तरे आणि उर्मटपणा पाहून महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी त्यांनी हवी ते कायदेशीर पाऊल उचलावे, आमचे काही म्हणणे नाही", असे अविनाश जाधव म्हणाले.
advertisement
भाजपला मराठी माणसांबद्दल चीड
"भाषेवरून मारहाण झाल्यानंतर व्यापारी जसे समाज म्हणून एकवटले, तसे आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ. जसा त्यांनी मोर्चा काढला, तसाच मोर्चा आम्हीही काढू. भाजपला मराठी माणसांबद्दल प्रचंड चीड आहे. येथील मेहता वगैरे हे लोक मराठी माणसांच्या विरोधात आहे", असेही अविनाश जाधव म्हणाले.
मनसे मराठीची शिकवणी सुरू करणार
advertisement
मनसेने आमच्यासाठी मराठीची शिकवणी सुरू करावी, असे काही व्यापारी नेत्यांनी म्हटले होते. त्यांच्या मागणीवर अविनाश जाधव म्हणाले, "सात तारखेला सकाळी ११ वाजता मराठीच्या शिकवणीसाठी पहिला वर्ग सुरू होईल, फक्त बोलबच्चन देऊ नका. मनसे कार्यालयात शिकवणीला या".
view commentsLocation :
Mira-Bhayandar,Thane,Maharashtra
First Published :
July 03, 2025 3:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा, मनसे संतापली, भाजपविरोधात एल्गार, जिथे त्यांचा मोर्चा तिथेच....









