केंद्रीय मंत्र्याचा फोन, सूत्रे फिरली, एटीसी-पायलटचा संपर्क झाला आणि विमान फिरलं, बँकॉक रिटर्न विमानाची इनसाईड स्टोरी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Hrishiraj Sawant Bangkok Return Flight: ऋषिराज सावंत काही दिवसांपूर्वीच दुबईहून परतला होता. त्यानंतर त्याला बँकॉकला जायचं होतं. त्यासाठी त्यानं आदल्या दिवशी चार्टर्ड प्लेन बुक केलं.
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी, पुणे : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचं कथित 'अपहरणनाट्य' सोमवारी रात्री चांगलंच रंगलं. मुलगा ऋषिराजला दोघे जण कारमधून घेऊन गेल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. पोलीस तपासात तो मुलगा लोहगाव विमानतळावरुन चार्टर्ड विमानानं मित्रांसह बँकॉकला निघाल्याचं समोर आलं. त्यानंतर सावंतांनी त्यांचं राजकीय वजन वापरुन लेकाला परत आणलं. यामध्ये नागरी उड्डाण मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते पुण्याचे खासदार आहेत. शिवाय नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नागरी उड्डाण मंत्रालयासारखे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे आहे.
ऋषिराज सावंत काही दिवसांपूर्वीच दुबईहून परतला होता. त्यानंतर त्याला बँकॉकला जायचं होतं. त्यासाठी त्यानं आदल्या दिवशी चार्टर्ड प्लेन बुक केलं. त्यावरुन सावंत कुटुंबात ९ फेब्रुवारीला जोरदार वाद झाला. त्यानंतर ऋषिराज बँकॉकला जाणार नाही, असं वडील तानाजी सावंत यांना वाटलं. पण तसं घडलं नाही. कुटुंबियांचं न ऐकता ऋषिराज दोन मित्रांसह विमानानं बँकॉकला निघून गेला.
advertisement
सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये खोटी तक्रार नोंदवली आणि....
ऋषिराज पुण्याहून निघून गेल्याचं कळताच तानाजी सावंतांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी आपले राजकीय संबंध वापरण्यास सुरुवात केली. ऋषिराज सज्ञान असल्यानं त्याला परत आणण्यासाठी अपहरणाची तक्रार गरजेची होती. त्यामुळेच सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर सूत्रं फिरली.
मुरलीधर मोहोळ यांना फोन लावला, त्यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला संपर्क केला अन्...
advertisement
तानाजी सावंत यांनी नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला. मोहोळ यांनी तातडीनं हालचाली केल्या. नागरी उड्डाण मंत्रालयानं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क केला. मग एटीसीनं ऋषिराज प्रवास करत असलेल्या विमानाच्या पायलटशी संपर्क साधला. साडेचार वाजता उड्डाण केलेलं विमान त्यावेळी बंगालच्या उपसागरावरुन उड्डाण करत होतं. तातडीनं माघारी फिरा, अशी सूचना एटीसीकडून पायलटला देण्यात आली.
advertisement
सर्वसामान्यांना दाद न देणारी यंत्रणा माजी मंत्र्यांसाठी तत्परतेनं कामाला लागली
एटीसीच्या सूचनेनंतर विमानानं यूटर्न घेतला. विशेष म्हणजे याची कल्पना विमानात बसलेल्या ऋषिराजला नव्हती. पुढच्या काही तासांमध्ये विमान पुण्यात लँड झालं. विमानातून उतरल्यानंतर ऋषिराजला आपण पुण्यातच आलो आहोत, याची कल्पना आली. त्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. सर्वसामान्यांना दाद न देणारी, तत्परतेनं मदत न करणारी यंत्रणा एखाद्या माजी मंत्र्यांसाठी कशाप्रकारे कामाला लागते, हेच यानिमित्तानं दिसून आलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 11, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
केंद्रीय मंत्र्याचा फोन, सूत्रे फिरली, एटीसी-पायलटचा संपर्क झाला आणि विमान फिरलं, बँकॉक रिटर्न विमानाची इनसाईड स्टोरी