रस्ते पाण्याखाली-शेतात घरात पाणी, नारंगी नदीनं ओलांडल नदीपात्र, खेडजवळच्या 15 गावांचा संपर्क तुटला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रत्नागिरीतील खेड तालुक्यात नारंगी नदीला पूर आल्याने १५-२० गावांचा संपर्क तुटला आहे. शेतं, विटांच्या भट्ट्या, स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे.
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातून वाहणाऱ्या जगबुडी नदीची उपनदी असलेल्या नारंगी नदीला जोरदार पूर आला आहे. यामुळे खेडमधील खाडीपट्टा विभागात जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचले असून, जवळपास १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.
नारंगी नदीचे पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात शिरले आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या अनेक विटांच्या भट्ट्या आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. याशिवाय, शेकडो एकर भातशेती पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
या पुराचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. आज पहाटेपासून दापोली आणि मंडणगड येथून खेडकडे येणाऱ्या अनेक एसटी बस रस्त्यावर अडकून राहिल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.नदीकाठच्या परिसरातील परिस्थिती गंभीर असून, स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
पुढील काही तास जर पावसाचा जोर कायम राहिला, तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी उंच लाटा उसळत आहेत. आज पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून इतर ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरीमध्ये संगमेश्वरमध्येही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
advertisement
मुंबई-ठाण्यातही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 19 ऑगस्ट रोजी देखील मुंबई ठाण्यासाठी पालघर, नाशिक, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.कोकणात नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडी झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 1:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रस्ते पाण्याखाली-शेतात घरात पाणी, नारंगी नदीनं ओलांडल नदीपात्र, खेडजवळच्या 15 गावांचा संपर्क तुटला