Shirur Loksabha : शिरूरमध्ये नेता की अभिनेता? मतदारांचा कौल कुणाला? घसरलेली टक्केवारी कुणाचं वाढवणार टेंशन

Last Updated:

Maharashtra Exit Poll 2024 : एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात एनडीएला काही जागांवर फटका बसत असल्याचे दिसत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांचा कौल कुणाला मिळणार?

अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव
अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव
शिरुर, (रायचंद शिंदे, प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिलं. परिणामी शिरूर लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली. त्यामुळं संपुर्ण राज्याचं लक्ष या मतदार संघाकडे होतं. बारामती शेजारील आणि बारामती इतकाच हा लक्षवेधी मतदार संघ आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना संधी दिली.
मतदार संघात फिरले नसल्याचा आरोप करत अमोल कोल्हेंना दुसऱ्यांदा खासदार होऊ न देण्याचा चंग बांधलेल्या अजित पवारांवर उमेदवार आयात करावा लागला हे इथल्या मतदारांना पटलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक आणि माजी खासदार शिवाजी आढळरावांना घड्याळाच्या चिन्हावर उतरविण्याची 'वेळ' अजित पवारांवर आली. मग सुरू झाली, ती आव्हान-प्रतिआव्हानांची लढाई. आधी अजित पवारांचं मग शिवाजी आढळरावांचं आव्हान कोल्हेंनी स्वीकारलं.
advertisement
आढळरावांच्या कंपनीशी संदर्भात केलेले आरोप आणि पुरावे सादर करण्याचं दिलेलं आव्हान, कोल्हेंनी पुराव्यानिशी जनतेसमोर मांडले. लोकसभा निवडणुकीतून बाहेर पडण्याचा दिलेला शब्द आढळरावांनी पाळावा. याची कोल्हेंनी आठवणही करून दिली. मात्र, झालेले आरोप आणि सादर केलेल्या पुराव्यांचा माझ्या कंपनीशी संबंध नसल्याचा आढळरावांनी पलटवार केला. पुढं जाऊन याचं रूपांतर सरड्याची अन् पोपटाची उपमा देण्यापर्यंत गेली. स्थानिक मुद्दे, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रखडलेला विकास हा मार्गी लावण्यासाठी नेता हवा की अभिनेता अशी फटकेबाजी ही झाली.
advertisement
शिरूर लोकसभेचा घाट ते दिल्ली ही शर्यंत कोण जिंकणार?
अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा खासदार होणार की शिवाजी आढळराव खासदारकीचा चौकार मारणार? यावरून तर्क-वितर्क लढवले जातायेत. अशातच गेल्या लोकसभेतील आणि यंदाच्या लोकसभेतील झालेली मतदानाच्या टक्केवारीवरून ही वेगवेगळे अंदाज बांधले जातायेत.
#शिरूर लोकसभेतील विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
विधानसभा 2024 2019
जुन्नर 58.16% 64.65%
आंबेगाव 62.95% 70.13%
advertisement
खेड-आळंदी 57.76% 62.20%
शिरूर 56.91% 61.45%
हडपसर 49.41% 57.45%
भोसरी 47.71% 47.84%
राज्यातील राजकारणाची घसरलेली पातळी. नेत्यांनी सोडलेली तत्व, निष्ठा आणि स्वाभिमान पाहून मतदारांचा राजकारण्यांवरील उडालेला विश्वास, सोबतचं शिरूर लोकसभेतील उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचा व्यत्यय, यामुळं मतदानाची टक्केवारी घसरली. शिरुर लोकसभा मतदार संघात 2019 ला 60.62 टक्के मतदान झाल होत. ते 2024 ला 54.16 पर्यंत खाली आलं. म्हणजे थेट 6 टक्क्यांनी मतांची घसरण झाली. आता या ना त्या कारणाने मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या मतदारांचा फटका कोणाला बसणार यावरून चर्चांना उधाण आलंय.
advertisement
तर दुसरीकडे लोकसभेतील 6 विधानसभांमध्ये 2019 साली आणि यंदा मतदानाच्या टक्केवारीत चांगलाच बदल झालाय. अमोल कोल्हेंना 2019 साली जुन्नर विधानसभेतून 41 हजार 551 मतांची आघाडी मिळाली होती. पण यंदा जुन्नर विधानसभेत 6.49 टक्के मतदान कमी झालंय. आढळरावांचा बालेकिल्ला असलेल्या आंबेगावमधून 25 हजार 697 अधिकची मतं कोल्हेंना मिळाली होती. पण यंदा इथून 7.18 टक्क्यांनी मतदान घटलंय. खेड-आळंदी विधानसभेत ही 7 हजार 446 मतांचं कोल्हेंना लीड होतं. तिथं ही 4.44 टक्क्यांची घसरण आहे. तसेच शिरूर विधानसभेतून ही 26 हजार 305 मतांनी कोल्हेंची आगेकूच कायम होती. पण इथं ही यंदा 4.54 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. भोसरी आणि हडपसरमध्ये शिवाजी आढळरावांना 37 हजार 77 आणि 5 हजार 370 मतांची आघाडी होती. मात्र, या विधानसभांपैकी हडपसरमध्ये 8 टक्के मतांची टक्केवारी खालावली. फक्त भोसरी विधानसभेत अवघं 0.13 टक्के इतकीच मतं कमी झालीत.
advertisement
2019 आणि 2024 या दोन्ही लोकसभांची टक्केवारी पाहता, खालावलेली टक्केवारी कोणाचं टेन्शन वाढवणार आणि कोणाला फायद्याची ठरणार. यावरून अनेक तज्ञ आपापली मतं नोंदवत आहेत. खरं तर इथे सुरवातीला डॉ. कोल्हे विरोधात आढळराव अशी असलेली लढत शेवटी शरद पवार विरोधात अजित पवार अशीच रंगली. अजित पवारांनी शेवटच्या 4 दिवसात डझनभर सभा तर शरद पवार यांनीही अर्धा डझन सभा घेतल्या.
advertisement
टक्का घसरला,फायदा कोणाला?
मतदानाचा टक्का घसरला की चिंता ही सत्ताधाऱ्यांची वाढते, असा आजवरचा अनेकांचा अभ्यास सांगतो. मागच्या वेळी कोल्हेंना निवडून आणणारी मंडळी यावेळी आढळराव यांचा प्रचार करत होती तर आढळरावांची ताकत असलेले पारंपारिक शिवसैनिक मात्र कोल्हेच्या बाजूने होते. त्यातच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अपघातामुळे मतदार संघात फिरले नाही. त्याचाही कोल्हे ना फायदा होईल. देशात आणि राज्यात असलेली मोदी विरोधी लाट यामुळे अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा शिरूर लोकसभेचा घाट गाजवतील आणि दिल्लीत तुतारी फुंकतील, असं बहुतांश राजकीय अभ्यासकांचं मत आहे.
मात्र, महायुतीची मतदार संघातील ताकद, सोबतचे 5 आमदार आणि त्यांनी कागदावर केलेलं बेरजेचं राजकारण सत्यात उतरलं तर मात्र शिवाजी आढळराव खासदारकीचा चौकार निश्चितपणे मारतील. त्यामुळं 25 लाख मतदारांच्या पचनी महायुतीचं की महाविकासआघाडीचं राजकारण पडलं हे चार जूनच्या निकालातूनचं स्पष्ट होईल. मात्र निकाला आधीच डॉ. कोल्हेचे मतदार संघात विजयाचे फ्लेक्स झळकू लागल्यान शिरूरला नेत्याची हवा आणि अभिनेत्याचा विजयाचा दावा असंच चित्र पाहायला मिळतंय.
मराठी बातम्या/पुणे/
Shirur Loksabha : शिरूरमध्ये नेता की अभिनेता? मतदारांचा कौल कुणाला? घसरलेली टक्केवारी कुणाचं वाढवणार टेंशन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement