भरत जाधव यांचं नवं नाटक रंगभूमीवर; 'या' दिवशी होणार शुभारंभाचे प्रयोग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या. नकारात्मक भूमिकाही त्यांनी केल्या.
मुंबई, 24 ऑक्टोबर : अभिनेते भरत जाधव गेली अनेक वर्ष रंगभूमीवर एकाहून एक दर्जेदार नाटकांसहीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पुन्हा सही रे सही, मोरूची मावशी, तू तू मीमी सारखी नाटकं सध्या रंगभूमीवर सुरू असताना भरत जाधन एक नवं कोरं नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहे. या नाटकातील त्यांची भूमिका फार वेगळी असून एक नवे भरत जाधव या नाटकातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटकं रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. अस्तित्व असं या नाटकाचं नाव असून भरत जाधव एण्टरटेनमेंटद्वारे नाटकाची निर्मिती करण्यात आलं आहे. येत्या 3 नोव्हेंबरला नाटकाचा शुभारंभ होणार आहे.
'अस्तित्व' हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. नाटकाचं लिखाण आणि दिग्दर्शन स्वप्नील जाधव यांनी केलं असून नाटकात भरत जाधव यांच्याबरोबर अभिनेत्री चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 'अस्तित्व' या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या. नकारात्मक भूमिकाही त्यांनी केल्या. मात्र आता बऱ्याच काळानंतर भरत जाधव या नाटकाच्या माध्यमातून एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. संतोष हसोळकर असं भरत जाधव यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
advertisement
हेही वाचा - Rupali Bhosle : हवाई सुंदरीलाही संजनाची भुरळ; रूपाली भोसले म्हणाली, आजपर्यंत फक्त बॉलिवूड सेलिब्रेटींना...
advertisement
एका कुटुंबाची कहाणी अस्तित्व या नाटकात पाहायला मिळणार आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असलेल्या कुटुंबाची ही कथा आहे. कुटुंबातील एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही कथा आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. साई पियुष यांचे या नाटकाला संगीत लाभले असून सरीता भरत जाधव या नाटकाच्या निर्माती आहेत.
advertisement
'' सर्वसामान्यांना भावणारी आणि हृदयाला स्पर्श करणारी ही कथा आहे. आपण नेहमीच सगळ्यांकडून कळत नकळत अपेक्षा ठेवत असतो. या अपेक्षांसोबत मेळ साधताना कुठेतरी आपण आपले अस्तित्व हरवून बसतो. अशा वेळी हे नाटक प्रत्येकाला नक्कीच सकारात्मक मार्ग दाखवणारे ठरेल. या अपेक्षांच्या गर्तेत गुरफटलेल्या अस्तित्वाचा शोध घेणारे हे नाटक, नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडेल. आपल्याच घरात किंवा आपल्या आजूबाजूला घडणारी ही कथा आहे, त्यामुळे प्रेक्षक या नाटकाशी समरूप होतील. एवढं नक्की की हे भावनिक नाटक कुटुंबाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यास मदत करेल", असं नाटकाचे दिग्दर्शक स्वप्नील जाधव यांनी म्हटलं आहे.
advertisement
शुभारंभ प्रयोग
- शुक्रवार ३ नोव्हेंबर दु. ४:३० वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
- शनिवार ४ नोव्हेंबर दु. ४:३० वा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले
- रविवार ५ नोव्हेंबर दु. ३:३० वा. श्री. शिवाजी मंदिर, दादर
- रविवार ५ नोव्हेंबर रा. ८:३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 24, 2023 1:27 PM IST










