दहावी निकाल (SSC Result 2023) हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा निकाल असतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात जन्माला आलेल्या आणि इथे शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra SSC Board) या संस्थेचं योगदान अनन्यसाधारण आहे. कारण प्रत्येकाकडे किंवा बहुसंख्यांकडे या संस्थेने दिलेलं किमान एक प्रमाणपत्र नक्की आहे. पुणे या ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ आणि ‘विद्येचं माहेरघर’ अशी ओळख लाभलेल्या शहरात या संस्थेचं राज्यातलं मुख्य कार्यालय वसलेलं आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीच्या दृष्टीने पायाभूत काम करण्यासाठी म्हणून 1 जानेवारी 1966 रोजी ही संस्था अस्तित्वात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्ड अधिनियम 1965नुसार संस्थेची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education अशा नावाने संस्था ओळखली जाते. दहावी आणि बारावी या दोन अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं, त्या परीक्षा इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सद्यस्थितीशी सुसंगत ठेवणं आणि शैक्षणिक दर्जा सांभाळणं ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टं आहेत.
संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आलेख सातत्याने चढता राहिलाय. 1 जानेवारी 1966 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अस्तित्वात आलं. 1976मध्ये कायदा दुरुस्ती करण्यात आली आणि मंडळाचं नाव बदलून त्याचं रूपांतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ असं करण्यात आलं. या शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एसएससी आणि एचएससी बोर्डाची परीक्षा म्हणून ओळखल्या जातात. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा आयोजित करणं हे शिक्षण मंडळाचं प्रमुख काम आहे. या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतल्या जातात. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बोर्डाकडून परीक्षांचे निकाल जाहीर केले जातात.
मार्च 2000मध्ये राज्यातल्या सुमारे 13 हजार शाळांच्या पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आज एका बाजूला शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्ड शाळांचे पर्याय वाढत असतानाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची लोकप्रियता आणि गुणवत्ता अजिबात कमी झालेली नाही. दर वर्षी लाखो नियमित विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देतात आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्णही होतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत परीक्षांचा निकाल जाहीर करत असताना गुणवत्ता यादी अर्थात मेरिट लिस्टही बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात येत असे; मात्र 2007नंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणं थांबवण्यात आलं.
दर वर्षी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि कोकण अशा विभागांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. विशेष म्हणजे गेली काही वर्षं सातत्याने या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे.
शिक्षणाचा दर्जा, त्यातलं सातत्य, कायद्यांची निर्निती आणि अंमलबजावणी, सगळ्या इयत्तांच्या सगळ्या विषयांच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती, परीक्षांचं वेळापत्रक तयार करणं, परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करणं, परीक्षेची यंत्रणा राबवणं, पेपर तपासणं, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं, आवश्यक ती गोपनीयता राखणं आणि पुनर्परीक्षार्थींच्या परीक्षा घेणं असा शिक्षण मंडळाच्या कामाचा पसारा आहे. हा कामाचा डोलारा सांभाळतानाही काळानुरुप होणारे बदल स्वीकारणं, अंगीकारणं याबाबतही बोर्ड सक्रिय आणि अद्ययावत आहे.