advertisement

उद्धव ठाकरे बातम्या (Uddhav Thackeray News)

प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा मिळालेल्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन सुरू केलेला पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना म्हणजे संघर्ष; शिवसेना म्हणजे जहाल आणि आक्रमक भूमिका, अशी प्रतिमा बाळासाहेबांनी आपल्या कृतीतून, आपल्या भाषणांतून, आपल्या चळवळींमधून तयार केली; मात्र शिवसेनेचा वारसा पुढे ज्यांच्याकडे आला त्या उद्धव ठाकरेंची ओळख मात्र मवाळ आणि मितभाषी नेता अशी होती. त्यामुळेच 2003 साली जेव्हा शिवसेनेच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंना पक्षाचं कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं, तेव्हा सर्वत्र याच मुद्द्यावरून चर्चा होत होती.

27 जुलै 1960 रोजी जन्मलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून फोटोग्राफी (Photography) या विषयात आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. विद्यार्थिदशेत असल्यापासूनच ते राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले असले, तरी त्यांची मुख्य ओळख उत्तम फोटोग्राफर अशीच होती. त्यांनी काढलेले वाघांचे, वन्यजीवांचे फोटोज, तसंच शिवरायांच्या किल्ल्यांची आणि वारीची केलेली हवाई फोटोग्राफी खूप लोकप्रिय ठरली होती. 2002मधल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आणि शिवसेनेने तिथे सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर 2003मध्ये त्यांना पक्षाचं कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं, तर 2004मध्ये बाळासाहेबांनी त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.

दरम्यान, उद्धव यांच्याकडे सूत्रं आल्यानंतर पक्षात दोन गट पडले होते. आधी नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी बंड केलं. त्यामुळे शिवसेनेला खूप मोठा धक्का बसला. राज ठाकरे हे त्यांचे चुलत बंधू, शिवाय त्यांचा करिष्मा मोठा, वक्तृत्व प्रभावी. त्यामुळे राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवातीच्या काळात शिवसेनेपुढे (Shivsena) मोठं आव्हान उभं केलं; मात्र या दोन्ही बंडांनंतरही उद्धव यांनी शिवसेनेला सांभाळलं आणि मोठं केलं, व्यापक केलं. वेगवेगळ्या आंदोलनांतून शिवसेनेची ओळख कायम ठेवली. एवढंच नव्हे, तर 2012मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतरही उद्धव यांनी शिवसेनेवरचं नियंत्रण गमावलं नाही.

1995मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं होतं. त्यानंतर 2014मध्ये भाजपसोबत शिवसेना पुन्हा सत्तेत आली. 2019ची निवडणूक मात्र या दोन पक्षांनी एकत्र लढवूनही ती युती निकालानंतर तुटली. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. नोव्हेंबर 2019मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ही आघाडी अनैसर्गिक असल्याची टीका झाली; मात्र तरीही त्यांनी कारभार केला. त्यानंतर दोन-तीन महिन्यांतच कोरोनाची जागतिक महामारी आली. सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप झाले. दोन मंत्री तुरुंगातही गेले. उद्धव यांच्या प्रकृतीसह अनेक अडचणी आल्या, तरी उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षांना सांभाळून घेत आपल्या परीने सत्ताशकट हाकला. ठाकरे कुटुंबातलं कोणीही आतापर्यंत सत्तेच्या राजकारणात उतरलं नाही, अशी टीका व्हायची. मुख्यमंत्री होऊन ठाकरे यांनी त्या टीकाकारांची तोंडं बंद केली; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसोबतची आघाडी अनैसर्गिक असल्याचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या बहुसंख्य मंत्र्यांनी जून 2022मध्ये बंड केलं. त्याची परिणती अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यात झाली.

पुढे वाचा …

सर्व बातम्या

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स